इंग्रजी अल्फाबेट

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

गरीब ग्रामस्थांची श्रीमंत शाळा

लेखकाचे नाव:- श्री. विलास शिवाजीराव जमदाडे. 
शाळेचे नाव:- जि. प. प्राथ. शाळा घोडेवाडी, ता.- दिंडोरी, जिल्हा- नाशिक. 
ईमेल:- vilasjamdade123@gmail.com
वाॅटसअप नंबर:- ९८८१३०७५६३




गरीब ग्रामस्थांची श्रीमंत शाळा
           
             फार पूर्वी करंजी देवस्थान येथे कर्दम ऋषींचा आश्रम होता. त्या ठिकाणी अनुसूचित जमातीचे लोक गाई-गुरे चारण्यासाठी परगावाहून येत असत. काही वर्षांनी त्यातील जुन्नर येथील लोकांनी हल्लीच्या ठिकाणी वास्तव्य केले. त्याच्या घोडे चारण्याच्या व्यवसायावरून या गावाला घोडेवाडी नाव पडले.
      दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी ग्रामपंचायतीची वाडी, स्वतंत्र महसुली गाव म्हणजे आमची घोडेवाडी. या गावातील बहुसंख्य लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून, शेती अत्यल्प असल्याने बहुसंख्य लोक शेतमजूरी करतात. शिवाय कुक्कुटपालन व पशुपालनाचा जोडधंदाही करतात.
        अशा या ४०- ५० घरांची लोकवस्ती असलेल्या गावात स्वातंत्र्यानंतर २१ जून १९४९ रोजी इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग असलेली जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थापना झाली आहे. सन १९९६- १९९७ पर्यंत शाळा मारूती मंदिरात असलेल्या कोंदट खोल्यांमध्ये भरत होती. अत्यंत कमी गावठाण असलेल्या या गावात शासनाकडून अंगणवाडी शेजारीच दक्षिणोत्तर ३०×२० फूट  जागेत दोन वर्ग खोल्यांची इमारत बांधून मिळाली अन तेव्हापासून शाळेने मोकळा श्वास घ्यायला सुरूवात केली. कालांतराने पुढील पाचसहा  वर्षांत मुख्याध्यापक कार्यालय, स्वयंपाक खोली,  मुलां- मुलींसाठी स्वच्छता गृह शासकीय अनुदानातून बांधून मिळाले आहे.
            गावातील बहुसंख्य ग्रामस्थ मोलमजुरी करणारे असल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतांनाही वानवाच. आठवडाभर काबाडकष्ट करायचे आणि गुरूवारी वरखेडा या शेजारच्या गावातील आठवडे बाजारातून आवश्यक शिधा खरेदी करून पुढील आठवड्याची बेगमी करायची. महिलादेखील पुरुषांच्या बरोबरीने काबाडकष्ट करणाऱ्या. आणि अशा या घोडेवाडी गावातील द्विशिक्षकी शाळेत सन-२००७ साली माझी बदली झाली. अत्यंत निसर्गरम्य, आल्हाददायक वातावरण असलेल्या गोरगरिबांच्या शाळेच्या सर्वागीण विकासासाठी पुरेपूर योगदान देण्याचा निश्चय शाळेत हजर झाल्यापासूनच केला. अनेक नाविन्यपूर्ण छोटेमोठे उपक्रम राबवून ग्रामस्थांचा विश्वास संपादन करून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थी, युवक आणि ग्रामस्थांमध्ये शाळेविषयी आत्मियता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. "आम्ही शिक्षक म्हणजे चार दिवसांचे सोबती. शाळा तुमची आहे. तुमच्या हक्काच्या वस्तूंची जशी तुम्ही काळजी घेता तशीच काळजी या वास्तूंची घ्या. शाळेत गावाचे भविष्य निर्माण होत आहे. गावाचा विकास साधायचा असेल तर त्याची सुरुवात शाळेपासून करा." असे भावनिक आवाहन सातत्याने केले. 
        एकदा सकाळी सकाळी सुखदेव कडाळे हे ग्रामस्थ शाळेत आले. नेहमीप्रमाणे पारंपरिक तव्याच्या आकाराची लोखंडी प्लेट वाजवून शाळा भरल्याचा टोल वाजवला. ते बघून कडाळे दादा म्हणाले, "सर, ह्या घंटेचा आवाज लोखंड वाजवल्या सारखा येतो. मी आपल्या शाळेसाठी घंटा घेऊन देतो." तीन साडेतीन हजार रुपये खर्च करून २.५०० किग्रॅ वजनाची पितळेची घंटा त्यांनी शाळेला भेट म्हणून दिली. त्या घंटानादातून फक्त विद्यार्थीच जागृत झाले नाही तर आजपर्यंत अनेक ग्रामस्थांना शाळेविषयीच्या आपुलकीने जागृत केले.
        मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या संत सखुबाई, मीराबाई, वैष्णवी या बचत गटांनी शालेय पोषण आहार घेण्यासाठी पाच डझन डिश, धान्य साठवण्यासाठी कोठी शाळेला भेट दिली. 
    जिल्हा परिषदेच्या कोट्यातून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक मिळण्याअगोदरच आमच्या गोरगरीब दानशूर ग्रामस्थांनी सन- २०१२ मध्येच प्रत्येक घरातून पाचशे रुपये असे एकूण ४२,०००/- रूपये जमा करून मुबलक व भक्कम लाकडी बाक खरेदी केले.
        शाळेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी देखील शाळेच्या विकासात योगदान देण्याचा निश्चय केला. गुलाब घोडे यांनी ११,०००/- रूपये, तत्कालीन पंचायत समिती सदस्य अँड. विलास निरगुडे यांनी ७,०००/- रूपये, सुरेश सुकटे, प्रकाश घोडे, अरूण भारमल यांनी प्रत्येकी ५,०००/- रूपये, कैलास घोडे, दामोदर सुकटे यांनी प्रत्येकी ३०००/- रूपये, शाळेतील शिक्षक आनंदराव गांगोडे, शोभा पाटील, प्रल्हाद सोनवणे, विलास जमदाडे यांनी प्रत्येकी ५,०००/- याचप्रमाणे बहुसंख्य नोकरदार माजी विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीनुसार भरीव आर्थिक मदत करून शाळेला लॅपटॉप, शालेय आवार रंगरंगोटी, डिजिटल वर्ग खोली निर्मिती, प्रोजेक्टर, अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर यासाठी एकूण ९०,०००/- रूपये खर्च करून डिजिटल स्कूलच्या निर्मितीत भरीव योगदान दिले आहे.
         आमच्या गावाला गावठाणच (मोकळी पडिक जागा) नाही. त्यामुळे आमच्या शाळेच्या दोन वर्ग खोल्या व मुख्याध्यापक कार्यालयाच्या मध्ये असलेली १०×३० फुटाचा अल्पसा मोकळा परिसर हेच विद्यार्थ्यांच्या कला-क्रीडा गुणांना वाव देण्यासाठीचे मैदान होते. शाळेच्या उत्तरेला तार कुंपणालगत ८-९ गुठ्ठयांची उंचसखल, गवत उगवलेली अस्वच्छ जागा होती. अनेक ग्रामस्थांनी येथेच उकीरडे तयार केले होते. संपूर्ण गावाची कचरा टाकण्याची हक्काची जागाच. ही जागा शाळेला लागूनच असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा ञास सहन करावा लागत होता. १५ ऑगस्ट २०१५ च्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमानंतर आयोजित ग्रामसभेत ही अस्वच्छ, उंचसखल जागा लेव्हल करून शाळेला दिली तर अस्वच्छता दूर होऊन शाळेला छोटेसे मैदान तयार होईल. तसेच गावातील लग्नसमारंभ व इतर छोटे मोठे कार्यक्रम घेण्यासाठी एक हक्काची जागा तयार होईल याबाबत उपस्थितांचे उद्बोधन केले. शासकीय योजनेतून इंदिरा आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरे बांधायला मुबलक जागा गावात उपलब्ध नसताना देखील ही जागा शाळेला मैदानासाठी देण्याचा दानशूर निर्णय ग्रामसभेतच येथील ग्रामस्थांनी मोठ्या मनाने घेतला. आंबेवणी गावाच्या तत्कालीन सरपंच शोभाताई मातेरे, उपसरपंच अशोककाका वडजे, सदस्य रामदास मातेरे व इतर सर्व सदस्यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करून जेसीबी लावून ही अस्वच्छ, उंचसखल जागा लेव्हल करून दिली, ६०/७० ट्रॅक्टर मुरूम टाकून दिला. ग्रामसेवकांनी देखील ही जागा शाळेला दिल्याचा ठराव करून ६ ड चा तयार करून दिला. अशाप्रकारे ग्रामस्थांच्याच दातृत्वामुळे शाळेला हक्काचे मैदान उपलब्ध झाले.
        तसे आमचे गाव म्हणजे मुबलक पाण्याचे गाव. पावसाळ्याच्या दिवसात भूगर्भात अवघ्या सात आठ फुटावर पाणी लागेल अशी स्थिती असतानाही आमच्या शाळेतील विद्यार्थी बाराही महिने स्टीलच्या पंचपाञीत सकाळी भरून ठेवलेले ७०- ७५ लीटर पाणी दिवसभर पिऊन आपली तृष्णा भागवत. शाळेला पिण्याच्या पाण्याची टाकी असावी अशी दुर्दम्य इच्छा आम्हा शिक्षकांना होती. त्यासाठी पालक मेळावा घेऊन विषय मांडला. अंदाजे ३०,०००/- रूपये खर्च पाच हजार लीटर साठवण क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीसाठी अपेक्षित होता. शाळेतील शिक्षक प्रल्हाद सोनवणे व विलास जमदाडे या दोघांनीही ५,०००/- रूपये प्रत्येकी देणगी देण्याचे जाहीर केले. आवश्यक असलेली उर्वरित रक्कम ग्रामस्थांनी यथाशक्ती लोकवर्गणी काढून देण्याचे ठरले. 
गावातील अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या सखुबाई सिताराम घोडे या ५०-६० वर्षे वयाच्या महिलेला हा निरोप लागताच आपल्या स्वतःच्या दहा पंधरा पांड शेतात लावलेली तयार भाजी त्याच दिवशी काढली. बाजारात नेऊन मिळेल त्या भावात विकली.  आणि दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी दोनशे रुपयांची चिल्लर ओंजळीत घेऊन त्या शाळेत दाखल झाल्या. आणि मला म्हणाल्या, "गुरूजी, ही माझी वर्गणी." सखुबाई च्या चेहऱ्यावरील भाव खूप काही सांगून जात होते. मी त्यांना विनंती केली की तुमच्या घरच्या तेल, मीठ, मिरची साठी हे पैसे राहू द्या. तुम्ही कशाला पैसे देता. इतर ग्रामस्थ देतील ना. पण सखुबाईच्या आग्रहास्तव मला ते पैसे स्वीकारणे भाग पडले. ते पैसे  स्विकारताना माझ्या अंतर्मनाला खरोखरच पाझर फुटला होता. किती विश्वास ठेवतात ना ग्रामस्थ आपल्या शिक्षकांवर....!
     अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या अशोकराव घोडे, दिपक जाधव, कमल जाधव, सरस्वताबाई सुकटे, शोभा शेळके, द्रोपदा कडाळे अशा कितीतरी ग्रामस्थांच्या दातृत्वाचे आलेले अनुभव बघून आम्हाला काम करायला, पुरेपुर योगदान द्यायला प्रचंड उर्जा प्राप्त होत रहाते.
        गावाच्या सप्ताहाच्या निमित्ताने काढलेल्या लोकवर्गणीतील शिल्लक रक्कम मोठ्या विश्वासाने शिक्षकांच्या हवाली करतात. गावातील प्राचीन मारूती मंदिर मोडकळीस आलेले असतानाही विद्येच्या या मंदिरासाठी भरभरून योगदान देणाऱ्या या दानशूर ग्रामस्थांपुढे आमचा माथा नम्रतेने नतमस्तक होतो.
    शे- सव्वाशे वर्षांपूर्वी संत गाडगेबाबा सांगून गेलेत....
       *खर्चू नका देवासाठी पैसा* |
*शिक्षणाला पैसा तोच द्या हो* ||
*शाळेहून नाही थोर ते मंदिर* |
*देणगी उदार शाळेला द्या* ||
 या उक्तीप्रमाणे गेल्या सहा- सात वर्षांत दहा- बारा लाखापेक्षा अधिक रकमेतून शाळेला मैदानाची जागा, मैदान सपाटीकरण, विद्यार्थ्यांना बघण्यासाठी लाकडी बाक, शालेय आवार रंगरंगोटी, लॅपटॉप, संगणक, प्रोजेक्टर, अभ्यासक्रम सॉफ्टवेअर, पिण्याच्या पाण्याची टाकी, स्टेज, म्युझिक सिस्टीम आदींसह अनेक कामे ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्याने मार्गी लागली आहेत. आणि म्हणूनच आमच्या शाळेचा नामोल्लेख *"गरीब ग्रामस्थांची, श्रीमंत शाळा"* असा अभिमानाने होतो आहे.
     शेवटी एवढच म्हणावेसे वाटते.....
*कसे व्हावे उतराई*
*गावाने केली नवलाई*
*शाळा म्हणजे आई*
*ऋण फेडण्यास*
*शब्द न उरले काही....*
*तुम्ही केलेली मदत नाही विसरणार कधी.....*
*आभार शब्दसरींनी भरूनी येणार*
*घोडेवाडी गावाचे नाव गर्जत राहणार.....*






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

*⚡विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*  https://zee24news.co.in/?p=12224 *👆Click Here👆* _आपल...